Monday, 18 October 2021

कोजागरी पौर्णिमा - नवान्न पौर्णिमा

 कोजागरी पौर्णिमा  🌕

     आपल्या भारतीय संस्कृती मधील सारे सण हे निसर्गचक्रशी बांधलेले आहेत. प्राचीन कृषी संस्कृतीशी ही त्यांचा अनुबंध आहे. कोजागरी पौर्णिमा असाच एक उत्सव. सदैव जागृत राहा, सावध राहा, निसर्गाशी बांधलेले राहा, धन आणि ज्ञाना साठी जागे राहा, असा संदेश देणारा हा उत्सव.

   आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी करतात. ही पौर्णिमा शरद ऋतू मधे येत असल्याने शरद पौर्णिमा देखील म्हणतात.

Kojagari Paurnima
Masala milk


         या रात्री आकाश निरभ्र व असंख्य चांदण्यांनी भरलेले असते . चंद्र पूर्ण प्रकाशित असतो म्हणून या रात्रीला वर्षातील सर्वात सुंदर रात्र देखील म्हटले जाते. चंद्र देखील या रात्रीला पृथ्वीच्या जवळ कोजागिरी पर्वता जवळ आलेला असतो.



     या रात्री मसाला दुध तयार करतात व या दुधात रात्री १२. ' वाजता चंद्राचे चांदणे पडले की प्राशन करतात. असे मानतात की या रात्री माता लक्ष्मी चंद्र मंडळातून भूतलावर उतरून को - जागरती असा प्रश्न विचारते, कोजगर्ती म्हणजेच कोण जागे आहे ? या रात्री जे जागे असतात त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. या रात्री वेगवेगळे पदार्थ तयार करतात व खेळ खेळत , नाचगाणे करत रात्र जागवतात.


     या दिवसात शेतकऱ्यांच्या हाताशी  नविन पिके आलेली असतात. चार महिन्यांचा पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते.  या दिवशी ज्येष्ठ अपत्य निरंजन असते, म्हणजेच या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याचे औक्षण केले जाते. 

नवान्न पौर्णिमा 🌾🌻🙏🏻

          नवान्न पौर्णिमा. 'नवान्न' म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार झालेले अन्न. ‘नवान्न पौर्णिमा' निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी साजरी केली जाते. त्या दिवशी घराघरांत 'नवे' बांधण्याची परंपरा आहे. आश्विन महिन्यात शरद ऋतू सुरू होतो. आश्विनात पौर्णिमा जर दोन दिवस असेल तर आदल्या दिवशीच्या रात्री 'कोजागिरी' आणि दुसऱ्या दिवशी 'नवान्न' पौर्णिमा असते.
Navanna Pornima


          धान्याच्या - भाताच्या लोंबी, आंब्याचे पान, कुरडूचे फूल, झेंडूचे फूल हे एकत्र बांधून 'नवे' केले जाते. नवान्न पौर्णिमेला एक 'नवे' देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते. नंतर तसेच नवे बांधले जाते. ते धान्याचे कोठार, तुळशी वृंदावन, गुरांचा गोठा, विहीर आदी ठिकठिकाणी बांधले जाते. सर्वत्र भरभराट होऊ दे असा त्यामागील अर्थ असतो. त्या दिवशी नवीन तांदळाच्या भाताबरोबर, नवीन तांदळाची खीरही करतात. या पौ्णिमेला नव्याची पौर्णिमा देखील म्हणतात.
           
            कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धीआणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा...🌕🌾🙏🏻