गुढीपाडवा - मराठी नववर्ष
गुढी पाडवा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून नूतन शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. त्याचबरोबर वर्षभरातल्या सण उत्सवांचा कालनिर्देश करणार्या नविन पंचांगाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस होय. शालिवाहन म्हणजे सात वाहन काळात शालिवाहन राजा याने शालिवाहन ही कालगणना सुरु केली. हा दिवस मराठी नववर्ष म्हणून देखील साजरा करतात.
पौराणिक संदर्भ
ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती करून सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. प्रभु श्रीराम १४ वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावणाचा वध करून चैत्र शुद्ध प्रतिपदेला आयोध्येला परतले होते. चैत्र गुढी पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे नवीन उदयोगाचा, व्यवसायाचा आरंभ, गृहप्रवेश करण्यास हा उत्तम मुहुर्त समजला जातो.
यंदा गुढीपाडवा शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी साजरा केला जाईल. या दिवसापासून विक्रम संवत् २०७८-७८ , व शालिवाहन शक १९४४ ची सुरुवात होईल.
पूजा- विधी
या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरापुढे उंचावर गुढी उभारली जाते .दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतिक आहे. सूर्योदयानंतर सकाळी उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी, झेंडूच्या फुलांचा हार, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठीची माळ बांधून त्यावर उपडा तांब्या बसवला जातो. बांबूच्या काठीला हळद, कुंकु व गंध लावला जातो, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. पाटावर तांब्याचा कलश मांडून, फुले, गंध, अक्षता ,अगरबत्ती, निरांजन यांनी पूजा केली जाते.
![]() |
दारापुढे सुंदर रांगोळी काढली जाते.दाराला आंब्यांच्या पानांचे तोरण बांधले जाते .सोबतच नविन पंचागाचे पूजन केले जाते.
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु॥
या मंत्राने प्रार्थना करून नंतर पंचांगावरील गणपतीचे पूजन केले जाते. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचले जाते.घराघरात पुरणपोळी,श्रीखंड-पुरी असे गोडाचे पदार्थ बनवले जातात. गुढीला कडुलिंब व पुरणपोळीचा नैवेदय दाखवला जातो.
![]() |
Gudi padva |
निसर्ग व आयुर्वेदिक महत्त्व
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात.जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात .चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं.
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात . रस्त्यावर चौकाचौकात मोठ्मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक वेशभूषा केली जाते, लेझिम, ढोल ,ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.
सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!