Friday, 17 March 2023

कृष्णकमळ

         जगभरातील सुंदर फुलांपैकी एक म्हणजे कृष्णकमळ.  जर तुम्हाला सुद्धा फुलांची,  फुलझाडांची आवड असेल तर मग तुम्हाला कृष्णकमळ नक्कीच माहीत असणार. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर फूल. त्यातही निळसर,  जांभळ्या रंगाचा कृष्णकमळ म्हणजे निसर्गाची सर्वोत्तम कलाकुसर. 

             इंग्रजीत 'Passion Flower ' , हिंदीत 'राखी फूल ' या नावाने ओळखतात.  शास्त्रीय नाव 'Passiflora Incarnata ' असे असून या फुलाच्या जगभरात ५०० हून अधिक प्रजाती आहेत.  या फुलाला आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.



  कृष्णकमळ आणि महाभारत संबंध 

                   निसर्गाचे हे अद्वितीय सौंदर्य महाभारताच्या उत्कटतेचा संदर्भ देते.मुळात नावातच कृष्ण असणाऱ्या या सुंदर फुलाचा संबंध हा महाभारताशी जोडला जातो. राखीसारख्या दिसणार्‍या या फुलात महाभारतातील अनेक पात्रे आपल्याला दिसतात. फुलांचा आकार बारकाईने पाहिला की असे आढळून येते की, 

      बाहेरील पाकळ्या ( Petals )  जांभळसर लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात ह्या पाकळ्यांची संख्या ही १०० असते ज्यांना लोक कौरव म्हणतात.

       त्याच्या वरील बाजूस मध्यभागी असलेल्या ५ पिवळ्या पाकळ्या ५ पांडवांपैकी प्रत्येकाचे प्रतिनिधित्व करतात. 

    मध्यभागी असलेला हिरवा म्हणजे बल्ब पाच पांडवांची राणी द्रौपदी. 

  त्यावरील तीन तंतू ब्रम्हा, विष्णू आणि शिव या तीन मुख्य देवतांचे प्रतिनिधित्व करतात. 

   फुलाच्या मध्यभागी असणारे गोलाकार श्रीकृष्णाचे शस्त्र सुदर्शन चक्र होय. 


  कसे लावणार कृष्णकमळ

      ही वनस्पती उष्ण कटीबंधीय क्षेत्रातून उद्भवली असल्याने उष्ण आणि दमट हवामानात जमिन किंवा कुंडीत वाढतात. सर्वोत्तम वाढी साठी तापमान १५° -३५°अशा ठिकाणी ठेवा


          कृष्ण कमळ फुलाला घरी आपल्या अंगणात, बागेत किंवा परसदारी लावता येते. कृष्ण कमळ घरी भांड्यात लावण्यासाठी, 50 टक्के मातीत 30 टक्के शेणखत टाकावे आणि त्यात जवळपास 20 टक्के वाळू मिसळावी. वाळू मिसळ्याचे कारण असे की वाळू मुळे मातीमध्ये पाण्याचा चांगला निचरा होतो आणि शेणखताचा वापर केल्याने फुलांची चांगली वाढ होते. फुल ज्या मातीच्या भांड्यात किंवा फुलदाणीत लावायचे असेल त्या मातीच्या फुलदाणीचा भांड्याचा आकार 12 ते 20 इंच दरम्यान असावा म्हणजे कृष्ण कमळ चे रोपट्याला वाढायला चांगला वाव मिळेल पाणी टाकण्यासाठी जागा राहील आणि रोपट्याची मुळे मातीत चांगली खोलवर जातील. 


         फुलांची रोपट्याची मुळे खूप खोल पसरतात. ह्या फुलाच्या बिया लागवडिपूर्वी काही तास पाण्यात भिजवून नंतर फुलदाणीत अथवा भांड्यात लावा. हे फुल सुमारे दोन आठवड्यांत बीमधून अंकुरते आणि रोपटे वाढू लागते. जर तुम्ही कलम करून रोप लावत असाल तर कलम केलेली फांदी पावसाळ्यात लावावी असा सल्ला दिला जातो कारण पावसाळ्यात कलम केलेली फांदी लावली गेली तर ही फांदी लवकर वाढते आणि परिणामी कृष्णकमळला चांगली फुले लागतात.


औषधी उपयोग

        या वेलीची मुळे सोडल्यास बाकी सर्व भाग औषधी उपयोगात आणले जातात. निद्रानाश, चिंता, एडीएचडी, फायब्रोमायाल्जीया अशा अनेक आजारात तोंडावाटे हे फुल खाल्ले जाते.  भाजल्या मुळे झालेल्या जखमा तसेच सूज यांच्या साठी फुलाचा थेट त्वचेवर प्रयोग केला जातो. अमेरिकेत १९७८ पर्यंत याचा वापर झोप येण्यासाठी तसेच चिंता दूर करण्यासाठी केला जात असे. अन्न पदार्थ आणि पेये यांच्या मध्ये फुलाचा वापर सुगंध म्हणून केला जातो.

      वरील गोष्टी अमलात आणल्यास सुंदर आणि भरपूर फुले देणारी कृष्ण कमळाची वेल तुमच्या बागेत बहरेल आणि सूर्यपक्षी, फुलपाखरे, मधमाशी  इत्यादी पाहुणे त्यांच्या भोवती बागडू लागतील. 


              अहा निसर्गाची करामत 
               नाही कुणा सांगता येत 
                  एवढयाशा फुलात 
                  उभे सारे महाभारत





Friday, 1 April 2022

Gudi Padva

 गुढीपाडवा - मराठी नववर्ष     

       गुढी पाडवा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील प्रमुख सण आहे. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून नूतन शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. त्याचबरोबर वर्षभरातल्या सण उत्सवांचा कालनिर्देश करणार्‍या नविन पंचांगाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस होय. शालिवाहन म्हणजे सात वाहन काळात शालिवाहन राजा याने शालिवाहन ही कालगणना सुरु केली. हा दिवस मराठी नववर्ष म्हणून देखील साजरा करतात.

पौराणिक संदर्भ 

          ब्रम्हदेवाने विश्वाची निर्मिती करून सृष्टीला चालना दिली तो पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. प्रभु श्रीराम १४ वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावणाचा वध करून चैत्र शुद्ध प्रतिपदेला आयोध्येला परतले होते. चैत्र गुढी पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक. त्यामुळे नवीन उदयोगाचा, व्यवसायाचा आरंभ, गृहप्रवेश करण्यास हा उत्तम मुहुर्त समजला जातो.

यंदा गुढीपाडवा शनिवार २ एप्रिल २०२२ रोजी साजरा केला जाईल. या दिवसापासून विक्रम संवत् २०७८-७८ , व शालिवाहन शक १९४४  ची सुरुवात होईल. 


          पूजा- विधी  

       या दिवशी महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरापुढे उंचावर गुढी उभारली जाते .दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतिक आहे. सूर्योदयानंतर सकाळी उंच बांबूच्या काठीला कडुलिंबाची डहाळी, झेंडूच्या फुलांचा हार, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठीची माळ बांधून त्यावर उपडा तांब्या बसवला जातो. बांबूच्या काठीला हळद, कुंकु व गंध लावला जातो, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो. पाटावर तांब्याचा कलश मांडून, फुले, गंध, अक्षता ,अगरबत्ती, निरांजन यांनी पूजा केली जाते. 

Gudi padwa



 दारापुढे सुंदर रांगोळी काढली जाते.दाराला आंब्यांच्या पानांचे तोरण बांधले जाते .सोबतच नविन पंचागाचे पूजन केले जाते.

          ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्ट फलप्रद । 

            प्राप्तेऽस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु॥ 

            या मंत्राने प्रार्थना करून नंतर पंचांगावरील गणपतीचे पूजन केले जाते. पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचले जाते.घराघरात पुरणपोळी,श्रीखंड-पुरी असे गोडाचे पदार्थ बनवले जातात. गुढीला कडुलिंब व पुरणपोळीचा नैवेदय दाखवला जातो.

Gudi padva
Gudi padva 



        निसर्ग व आयुर्वेदिक महत्त्व 

            चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात.जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात .चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं.      

      महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकठिकाणी शोभायात्रा काढल्या जातात . रस्त्यावर चौकाचौकात मोठ्मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक वेशभूषा केली जाते, लेझिम, ढोल ,ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.


सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

  


Thursday, 3 February 2022

पोपटी

 पोपटी..

      पोपटी ही पारंपारिक आगरी रेसिपी आहे. जी मुख्यत्वे हिवाळ्यात केली जाते.

     मडक्या मधे वालाच्या शेंगा, ,भांबुर्डीचा पाला,अंडी, चिकन, बटाटे असे जिन्नस घालून मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजवले जातात, यालाच पोपटी म्हणतात. आपला रायगड जिल्हा विशेषतः अलिबाग, पेण, पनवेल, उरण कडील भाग अशा पोपटी पार्टी साठी प्रसिध्द आहे.

       

Popati
Popati 
    

रायगड जिल्हयात भातशेती नंतर रब्बी हंगामात मळे केले जातात. यात मुख्यत्वे वाल, मुग, मटकी , चवळी, माठ , कांदे, मुळा, यांची लागवड केली जाते. पौष महिना म्हणजे थंडीचा मौसम चालू होतो. तोपर्यंत शेतात वालाच्या शेंगा सुध्दा तयार होतात व त्याच बरोबर सर्वांना  ' पोपटी ' चे वेध लागतात. ठिकठिकाणी शेतावर, घराबाहेर अंगणात , मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्याची धमाल पाहायला मिळते.

          स्थानिक गावठी वालाच्या शेंगा हया चवीला गोड, चवदार ,

वालाच्या शेंगा 

टपोऱ्या दाण्याच्या असतात. व त्या पोटाला बाधत नाही हे विशेष . अशा वालाच्या शेंगा मुख्यतः रायगड जिल्ह्याच्या मातीत पिकत असल्याने रायगड जिल्हा हा पोपटी साठी प्रसिध्द आहे. मुंबई व आजूबाजूच्या शहरातील खवय्ये या पोपटी पार्टी साठी जिल्हयात येत असतात. 

    वालाच्या शेंगा व भांबुर्डीचा पाला ज्याला स्थानिक बोली भाषेत 'मारभेटी ' असे ही म्हणतात ,हे मुख्य पदार्थ पोपटी साठी वापरले जातात. 

भांबुर्डीचा पाला


पोपटी बनवन्यासाठी लागणारे साहित्य : 

  वालाच्या शेंगा,  भांबुर्डीचा पाला , बटाटे,  मीठ, मकयाची कणस. 

मांसाहारी पोपटी साठी : अंडी, तिखट मीठ लावून एकजीव केलेल चिकन, आवडीनुसार आणखी काही पदार्थ वापरले जातात.

 मातीचे मडके, आगीसाठी लाकडे , मोकळी जागा 

Popati
Popati 

पोपटी बनवण्याची पद्धत : 

         प्रथम मोठ्या मडक्यामधे तळाला भांबुर्डीचा पाला टाकला जातो, त्यावर वालाच्या शेंगांचा थर लावला जातो. त्यावर  आवडीनुसार अंडी, बटाटे, चिकन , मक्याचे कणीस यांचा थर लावला जातो. त्यावर खड्याचे मिठ ,  तिखट चवीनुसार पसरवला जातो. पुन्हा तसाच थर लावला जातो. 

         



         मडके भरल्या नंतर मडक्याचे तोंड भांबुर्डीचा पाल्याने घट्ट बंद केले जाते. तीन दगडांवर मडके उपडे ठेवून चहूबाजूने लाकडे पेटवली जातात. अर्धा ते पाऊण तासात पोपटी शिजून तयार होते. 

  थंडीच्या दिवसांत रात्री शेकोटी जवळ बसून गरमागरम पोपटी चा आस्वाद घेणे म्हणजे एक वेगळाच आनंद..


Monday, 18 October 2021

कोजागरी पौर्णिमा - नवान्न पौर्णिमा

 कोजागरी पौर्णिमा  🌕

     आपल्या भारतीय संस्कृती मधील सारे सण हे निसर्गचक्रशी बांधलेले आहेत. प्राचीन कृषी संस्कृतीशी ही त्यांचा अनुबंध आहे. कोजागरी पौर्णिमा असाच एक उत्सव. सदैव जागृत राहा, सावध राहा, निसर्गाशी बांधलेले राहा, धन आणि ज्ञाना साठी जागे राहा, असा संदेश देणारा हा उत्सव.

   आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा साजरी करतात. ही पौर्णिमा शरद ऋतू मधे येत असल्याने शरद पौर्णिमा देखील म्हणतात.

Kojagari Paurnima
Masala milk


         या रात्री आकाश निरभ्र व असंख्य चांदण्यांनी भरलेले असते . चंद्र पूर्ण प्रकाशित असतो म्हणून या रात्रीला वर्षातील सर्वात सुंदर रात्र देखील म्हटले जाते. चंद्र देखील या रात्रीला पृथ्वीच्या जवळ कोजागिरी पर्वता जवळ आलेला असतो.



     या रात्री मसाला दुध तयार करतात व या दुधात रात्री १२. ' वाजता चंद्राचे चांदणे पडले की प्राशन करतात. असे मानतात की या रात्री माता लक्ष्मी चंद्र मंडळातून भूतलावर उतरून को - जागरती असा प्रश्न विचारते, कोजगर्ती म्हणजेच कोण जागे आहे ? या रात्री जे जागे असतात त्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. या रात्री वेगवेगळे पदार्थ तयार करतात व खेळ खेळत , नाचगाणे करत रात्र जागवतात.


     या दिवसात शेतकऱ्यांच्या हाताशी  नविन पिके आलेली असतात. चार महिन्यांचा पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते.  या दिवशी ज्येष्ठ अपत्य निरंजन असते, म्हणजेच या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याचे औक्षण केले जाते. 

नवान्न पौर्णिमा 🌾🌻🙏🏻

          नवान्न पौर्णिमा. 'नवान्न' म्हणजे नवीन अन्न. त्या दिवसाला नावाप्रमाणेच महत्त्व आहे. नवान्न म्हणजे नवीन तयार झालेले अन्न. ‘नवान्न पौर्णिमा' निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी साजरी केली जाते. त्या दिवशी घराघरांत 'नवे' बांधण्याची परंपरा आहे. आश्विन महिन्यात शरद ऋतू सुरू होतो. आश्विनात पौर्णिमा जर दोन दिवस असेल तर आदल्या दिवशीच्या रात्री 'कोजागिरी' आणि दुसऱ्या दिवशी 'नवान्न' पौर्णिमा असते.
Navanna Pornima


          धान्याच्या - भाताच्या लोंबी, आंब्याचे पान, कुरडूचे फूल, झेंडूचे फूल हे एकत्र बांधून 'नवे' केले जाते. नवान्न पौर्णिमेला एक 'नवे' देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते. नंतर तसेच नवे बांधले जाते. ते धान्याचे कोठार, तुळशी वृंदावन, गुरांचा गोठा, विहीर आदी ठिकठिकाणी बांधले जाते. सर्वत्र भरभराट होऊ दे असा त्यामागील अर्थ असतो. त्या दिवशी नवीन तांदळाच्या भाताबरोबर, नवीन तांदळाची खीरही करतात. या पौ्णिमेला नव्याची पौर्णिमा देखील म्हणतात.
           
            कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धीआणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो!

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा...🌕🌾🙏🏻


   
  

Monday, 6 September 2021

पिठोरी अमावस्या (भारतीय मातृदिन )

 पिठोरी अमावस्या (भारतीय मातृदिन ) 🙏🏻

   

Pithori amavasya - bhartiy matrudin
Pithori Puja 

      श्रावण आमावस्येला  पिठोरी अमावस्या म्हणतात. पिठोरी अमावस्याचंच दुसरं नाव मातृदिन वंश तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्य साठी हि पूजा केली जाते सोळा सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घ आयुष्य आरोगय देणारी हि अमावस्या आहे. महाराष्ट्रात या दिवशी पिठोरी व बैलपोळा हे दोन सण  साजरे केले जातात. रायगड , ठाणे पालघर, किनारपट्टी भागातील आगरी , कोळी , कुणबी , समाजातील लोक मोठ्या उत्साहाने पिठोरीचा सण  साजरा करतात. श्रावण महिन्यातील हा शेवटचा सण होय. 

     



       हि प्राचीन परंपरा आहे . परंतु पिठोरी अमावस्या मातृदिन म्हणून देखील साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे .  हि प्रथा कशी सुरु झाली त्याची हि कहाणी ....
Pithori amavasya - bhartiy matrudin
Matrudin 

        भविष्य पुराणात अशी कथा आहे कि , एका महिलेने मृत  बाळाला जन्म दिला . त्यामुळे ती वनात गेली व घोर तपश्चर्य करून ६४ योगिनींना प्रसन्न करून घेतले व माझे बाळ जिवंत राहावे अशी पार्थना केली आणि ६४ जोगिणींच्या आशीर्वादाने तिचे मृत बाळ जिवंत झाले व कित्येक वर्ष जिवंत राहिले . या कथेचा सारांश इतकाच आहे कि , पुत्र जिवंत (सक्रिय) हवा . जिवंत पुत्र म्हणजे गुणवान , संस्कारी असा कुलदीपक . कारण अशी  मुलेच आई बापाचे नाव उज्वल करतात . आईचे मस्तक (नाव) जगात उंचावते .भारतीय संस्कृती अशी असंख्य वीरमातांनी विभूषित असते .

     गावातील पुरुषमंडळी सकाळी रानात जाऊन पिठोरी पूजेसाठी लागणारी पत्री , पाने ,फुले गोळा करतात .पत्री पुढीलप्रमाणे असते 

       

Pithori pujechi patri
Pithori pujechi patri 

        दर्श पिठोरी आमावस्या !दिंड्याची पाने - २. तेरडे - २ वडाच्या फांद्या - २ (१६ १६पाने) लव्हेच्या जुड्या - २ (१६ १६ नग) । तीळ - २ नारलीची वेल, --२ फुलासह कलयीची वेल, शेंदूरलीची वेल, गोमेटाची वेल, हळदीचा फुल, गाभोळी, रान घुंगरू, मंजिरी, कुड्याच्या फांद्या २ (१६-१६पाने) अक्षता वाळू (बनवलेला) देव. लव्हाचा कडा (१६ गाठी ) दुर्वांची अंगठी (१६ गाठी) (वरील १६ प्रकारच्या वस्तू शक्यतो १६ -१६च्याच पटीने घेतात  ) 

नंतर शंकराच्या मंदिराजवळील वाहत्या पाण्यात त्याची पूजा करतात . नंतर झोळीत बांधून घरी आणतात . येताना ''हर हर महादेव '' असा जयघोष करत येतात . 

Pithori amavasya -
Pithache dive 

या दिवशी सर्व पिठाचे दिवे , पिठाचे पदार्थ करतात , म्हणून या अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात . 

    पिठाचे १६  लव्हे,   पिठाच्या ३२  सर साखळ्या ,१६  पातोळ्या  बनवल्या जातात एकुण ६४  पिठाचे पदार्थ ६४ योगिनी साठी बनवले जातात. 

पिठोरी पुजेचा विधी -

            भिंती वर पिठोरी पुजेचा चित्रपट काढला जातो. नंतर केळीच्या पानावर रानातून आणलेल पत्रीचे पूजन केले जाते करताना हातात लव्हा  पासून बनवलेले कडे व दुर्वापासून  बनवलेली अंगठी घालतात. गंध, अक्षता, बेल, फुल, फळे वाहुन पुजा केली जाते. 

Tandlachi kheer, Patolya
naivedya 

तांदळाची खीर, पातोरी, माठाची भाजी यांचा नवेद्य दाखवला जातो. पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण?' ( उचित वाण कोण घेणार ) असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे  घेतात.पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.अशा मातांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे श्रावण वद्य अमावास्या म्हणजेच पिठोरी आमवास्या. आता ६ सप्टेंबरला पिठोरी अमावास्या (पोळा) आणि महान भारतीय स्त्रियांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हाच दिवस (६ सप्टेंबर) मातृदिन म्हणून साजरा करूया.

सर्वाना पिठोरी अमावास्येच्या व बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्या ...

''हर हर महादेव'' ....

Sunday, 29 August 2021

गोपाळकाला - श्री कृष्ण जन्माष्टमी

         गोपाळकाला - श्री कृष्ण जन्माष्टमी -पनवेल ची पारंपरिक दहीहंडी  

                जेव्हा जेव्हा धरतीवर अन्याय,अनीती, अधर्म वाढत गेला तेव्हा तेव्हा भगवंतांनी मानवाच्या कल्याणाकरिता धर्तीवर अवतार घेतले .

         भगवान श्री विष्णूंनी मानवाच्या कल्याणाकरिता अनेक अवतार घेतले , पण श्री कृष्ण हा अवतार सगळ्यात प्रभावी , जनमान्य आणि सर्वाना हवाहवासा ठरला.प्रत्येक आईला वाटत आपले मूल कृष्णासारखे खोडकर असावे , प्रत्येक तरुणीला वाटत आपल्यालाही राधेप्रमाणे  कृष्णसखा  मिळावा, प्रत्येक माणसाला वाटत आपल्यालाही सुदाम्याप्रमाणे कृष्णासारखा मित्र मिळावा . आयुष्याचे पेच सोडवताना प्रत्येकाला वाटत की  आपल्यालाही पार्थ प्रमाणे सारथी म्हणून श्री कृष्ण लाभावा . त्यामुळेच आज हजारो वर्षांनंतर हि या युगपुरुषाचा ठसा जन माणसावरून जराही पुसट झालेला नाही .

shri krishna  

        श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी या नक्षत्रावर मथुरेत  कंसाच्या बंदी शाळेत श्री कृष्णाचा माता देवकीच्या पोटी जन्म झाला . नंतर पिता वासुदेवाने श्री कृष्णाला गोकुळात नंद व यशोदेकडे श्री कृष्णाला आणून सोडले. कृष्णजन्म म्हणजेच गोकुळाष्टमी . श्री कृष्ण जयंती जन्माष्टमी या नावाने हि हा दिवस साजरा केला जातो .

       भारता मध्ये सर्वत्र जन्माष्टमीच्या उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उत्तर भारत, ईशान्य भारत , व गुजरात मध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात . महाराष्ट्रात जन्माष्टमी दहीहंडी उत्सवासोबत साजरी केली जाते.

            काला म्हणजे दही , दूध , लोणी हे सारे पदार्थ एकत्र करून केलेला पदार्थ. म्हणूनच याला दहीकाला असेही म्हणतात. श्री कृष्णाने वृंदावनातून सर्व बालगोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून सर्व पदार्थांचा एकत्र काला केला . याच गोष्टीवरून गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.श्री कृष्णाची हि कृती म्हणजे समाजातील भेदाभेद , श्रेष्ठ - कनिष्ठ  या कल्पनांना छेद देऊन समानतेचे तत्त्व आहे .

     गोपाळ म्हणजे गायीचे पालन करणारा , काला म्हणजे एकत्र मिसळणे , गोपालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो .

महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुख्यतः मुंबई, ठाणे , नवी मुंबई,  च्या भागात पथक मधील सारे गोविंदा उंचच उंच थर रचून हंडी फोडतात . 

Dahihandi 

पनवेल ची पारंपरिक दहीहंडी 

    दहीहंडी म्हटले कि आम्हा पनवेलकरांचा उत्सव . पनवेल मधील बापट वाडा येथील दहीहंडीला ऐतिहासिक महत्व असून १७३० पासून हा सण परंपरेनुसार आज हि सुरु आहे . पनवेल शहरात नवनाथांची शक्तिपीठे आहेत . या ठिकाणचे नवनाथ भक्त या उत्सवात सामील होतात . येथील दहीहंडीला ना लाखोंची बक्षिसे असतात ना गोविंदांचे उंचच उंच थर लागतात .  ६ ते ७ फुटांच्या उंचीवर येथे हंड्या टांगल्या जातात . नवनाथ भक्त हंडीभोवती गोलाकार जमतात .त्यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार ही दहीहंडी एका काठीने फोडली जाते.  जमलेल्या गोविंदांना आसुडाचे (जाडा दोरखंड) फटके मारले जातात. हा

पनवेल ची दहीहंडी 



एक परंपरेचाच भाग आहे . पनवेल मध्ये बापट वाडा , लाईन आळी, परदेशी आळी या भागात अशा प्रकारची दहीहंडी पाहायला मिळतात. 

 जवळपास ३०० वर्षांपासून पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करतात .

गावची दहीहंडी 

                       

गाव ची दहीहंडी 

       आमच्या येथे कोळखे गावात हि अशाच प्रकारची हंडी पाहायला मिळते. नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून गावातील मंदिरात हरिनाम सप्ताह बसवला जातो . श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे ८ दिवस पूजन केले जाते . गोपाळकाल्याच्या दिवशी काल्याच्या महाप्रसादाने या सप्तहाची सांगता होते . या सात दिवसात मंदिरात भजन , कीर्तन , हरिपाठ असे भक्तिमय वातावरण असते . या संपूर्ण आठवड्यात  आळीपाळीने गावातील प्रत्येकजण  मंदिरातील वीणेचे वादन करीत असतो , सप्ताह बसल्यापासून गोपाळकाल्यापर्यंत वीणा खाली न ठेवण्याची प्रथा आहे . गोपाळकाल्याच्या दिवशी  पारंपरिक पद्धतीनुसार दहीहंडी एका काठीने फोडली जाते.  जमलेल्या गोविंदांना आसुडाचे (जाडा दोरखंड) फटके मारले जातात. 

" देवाची हंडी '' असे या दहीहंडीला म्हणतात . 

सर्वांन गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...

राम कृष्ण हरी 🙏🏻🌺

नवनाथ भक्त 






    

Friday, 20 August 2021

तुळस - तुळशीचे औषधी फायदे



 तुळस - तुळशीचे औषधी  फायदे

 ( तुलसी, basil , tulsi, holy basil  )



                                  तुलसी श्री सखी शुभे 
                                   पाप हारींनी पुण्य दे 
                                   नमस्तेय नारदमुने 
                                   नारायणी मनप्रिये 
Tulsi


     

 

                आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या दारापुढे तुळस असते . रोज आपल्याकडे तुळशीची पूजा केली जाते . तुळस हि विष्णुप्रिय आहे .भगवान विष्णूंचा कोणताही नैवेद्य तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही . तुळशी पूजनाशिवाय नित्य पूजा पूर्ण होऊ शकत नाही . तुळशीच्या पूजनाने भगवान विष्णू संतुष्ट होतात . 

       तुलसी मातेस पाणी घालणारे सदा सर्व काळ सुखी होतात . तुलसी पूजा भक्तिभावे करणारे सारेच जण श्री कृष्ण प्रिय म्हणजेच भगवान विंष्णूचे प्रिय होतात . वारकरी आणि तुळशीचं नातं तर जगावेगळं आहे . वारकर्यांची खरी ओळख हि त्याच्या गळ्यातील तुळशीमाळ मुळेच असते . ज्याच्या दारापुढे तुळशी वृंदावन आहे देव त्याला कधीच विसरत नाही.

              तुळस जशी देवपूजनात महत्वाची तसेच तिचे अनेक औषधी गुणधर्मही आहेत. तुळस आपल्या आसपासची नकारात्मक ऊर्जा शोषून घेते व वातावरण सकारात्मक बनवते . तुळशीच्या पानात ऑक्सिजन ची मात्र भरपूर प्रमाणात आढळते . 

तुळशीचे अनेक प्रकार आहेत . 

  •  कृष्ण तुळस
  •  राम तुळस
  • रान तुळस 
  • लवंगी तुळस 
  • कापूर तुळस 
   आपल्याकडे मुख्यतः दोन प्रकार जास्त प्रमाणात पाहावयास मिळतात . राम तुळस व कृष्ण तुळस .

राम तुळस , Ram Tulas 

कृष्ण तुळस , krushna Tulas 
  

 प्रत्येक तुळशीचा गुणधर्म हा वेगवेगळा आहे . त्यात हि लाल रंगाची कृष्ण तुळस हि सर्वप्रिय आहे . 

                      सफेद रंगाची राम तुळस हि शीतवर्णी तर लाल रंगाची कृष्ण तुळस हि उष्णवर्णी असते . राम तुळशीचा वास हा सामान्य असतो तर कृष्णतुळसीचा वास हा उग्र असतो . उन्हाळ्यात जर आपल्याला सरबत काढा रस करायचा असेल तर त्यात
रामतुळशीच्या पानांचा वापर करावा . थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला चहा काढा यामध्ये कृष्णतुळशीच्या पानांचा वापर करावा .   

 तुळशीचे घरगुती फायदे

२०० हुन अधिक आजारांपासून तुळस आपले रक्षण करते .

  • तुळशीमध्ये खूप सारे अँटिऑक्सिडेन्ट आणि अँटीबॅक्टरील प्रॉपर्टीस असतात , जे आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असतात. 
  • तुळस हि आपल्याला कॅन्सर सारख्या भयानक आजारापासून दूर ठेवते , तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्यास कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते .
  • तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्यास ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो .
  • जर सर्दी , खोकला , डोकेदुखीने त्रस्त असाल तर तुळशीच्या काढ्याने आराम मिळतो .
  • तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपली श्वसन क्रिया सुरळीत होते .
  • तुळशीचा रस खाज, खरूज , त्वचा विकारांवर परिणामकारक ठरतो .
  • जीवनसत्व अ, ब, आणि अनेक पोषक तुळशीत आहेत . तुळशीचे तेल एक जैवप्रतिविरोधी आणि प्रतिरोधी मानले जाते 
  • किडा चावल्यास , जखम झाल्यास , पिंपल्स , काळे डाग यावर तुळशीच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो .
  • केस गळणे, केस पीकणे ,कोंडा होणे यावर तुळशीचा अर्क परिणामकारक ठरतो .
  • कान दुखीवर तुळशीचा पानांचा रस गरम करून कानात १/२ थेंब घातल्याने आराम मिळतो .
  • दात दुखी , मुख दुर्गंधी अशी समस्या असेल तर कोमट पाण्यात तुळशीच्या अर्काचे थेंब घालून गुळण्या केल्यास फरक जाणवतो .

          त्यामुळेआयुर्वेदामध्ये   याचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो . भारतामध्ये तुळशीला घरघुती औषधांचा भांडार मानले जाते .


Monday, 2 August 2021

दीप पूजन ( दर्श अमावस्या ) 🪔🌺🙏🏻

 दीप पूजन  ( दर्श अमावस्या ) 🪔🌺🙏🏻


                           शुभं करोति केल्यानं आरोग्यम धनसंपदा ।

                           शत्रुबुद्धी विनाशाय दीप काय नमोस्तुते ॥

                           दीपो ज्योती पर ब्रम्ह दीपो ज्योती जनार्दन ।

                            दीपो हारतु मी पाप संध्यादिप नमोस्तुते ॥

                  

                  दीप हे मांगल्याचे प्रतीक , दीप हा अंधाराचा नाशक , मग अंधार झाल्यावर घरात लावलेला कंदील असो , देवासमोर तेवणारी समई असो , औक्षण करणारी पंचारती असो , अथवा तुळशीसमोर लावलेली पणती असो, कोणत्या न कोणत्यारूपात दिवा आपल्या सभोवतालचा नाधर दूर करत असतो . आपल्या हिंदू संस्कृती मध्ये दिव्याला अनन्यसाधारण  महत्व आहे . अन याच दिव्याविषयी कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केली जाते . 

       दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी पासून श्रावण मास चालू होतो . अनेक जण हि अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजरी करताना दिसतात . पुढे श्रावण महिनाभर मांसाहार खाणे निषिद्ध असल्याने या दिवशी म्हणजे आषाढ अमावास्येला मांसाहारावर मनसोक्त ताव मारण्याचा अनेकांचा कल असतो. सध्या गटारी अमावस्या हे नाव इतके प्रचलित झाले आहे कि या दिवशी दीप अमावस्या असते हे देखील अनेकांना माहिती नसते . गटारी अमावास्याचे नादात  अनेक जण आपली संस्कृती विसरताना दिसतायेत. 

Dip Pujan 


          दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे . या दिवशी दिव्यांची आरास केली जाते . हि पूजा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करावी .  दीप अमावस्येची पूजा विधी पुढीलप्रमाणे :

  •  सर्वात आधी जमीन स्वच्छ पुसून घ्यावी .
  •  जमिनीवर पाट ठेवून पाटावर स्वस्तिक काढावे .
  •  घरातील सर्व दिवे सवच्छ धुवून व पुसून घ्यावेत .
  •  पाटावर या सर्व दिव्यांची आरास करावी .
  •  पाट सभोवती रांगोळी काढावी.
  •  दिव्यांना फुल , गंध , अक्षता वाहाव्यात .
  •  गोडाचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा .

 नमस्कार करून प्रार्थना करावी व पुढील मंत्र म्हणावा 


         🙏🏻🌺🪔  ''दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌ गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥ 🪔🌺🙏🏻


          माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया !


सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा !🪔🌺🙏🏻